शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी प्रशासनाच्या झाडझडतीची भाषा केली आहे.
"संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणे गरजेचं", संजय राऊतांचा पुन्हा धमाका
मुंबई, 11 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवरून ठाकरे सरकार (Thackeray Government) अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बंडामुळे सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याचं चित्र आहे. मुंबईचे माजी पोलीस अधिकारी परमवीर सिंह (IPS Param bir singh) यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर हाय कोर्टाने चौकशीचे आदेश दिले आणि थेट गृहमंत्र्यांनाच पायउतार व्हावं लागलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी प्रशासनाच्या झाडझडतीची भाषा करत 'सामना' दैनिकातील 'रोखठोक' या सदरातून पुन्हा एकदा चर्चेचा धुरळा उडवून दिला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्ठा नक्की कोठे आहेत? ते तपासून घ्यावे लागेल, असं वक्तव्य गृहमंत्रिपदाची धुरा स्वीकारताना दिलीप वळसे पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, ' हे फक्त विधी, न्याय व गृहखात्यापुरतेच नाही, तर संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणे गरजेचे आहे.'
'महाराष्ट्रातले बिगर भाजप सरकार त्यांच्या डोळय़ात खुपते आहे. त्यामुळे मंत्र्यांना सरसकट बदनाम करा हे त्यांचे धोरण आहे,' असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.